आत्मभानाचा काव्यागाज


अवतीभवतीच्या वातावरणासह त्यातील सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ आपल्याला अनेकार्थानं समृद्ध करीत असतात. सभोवतालचा परिसर, अर्थात जंगल, त्यातील वृक्ष, नदी, नाले, पशू-पक्षी या नैसर्गिक घटकांसोबतच समाजातील विविध घटना-अनुभवांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. त्यापासूनच आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. काय चांगलं-काय वाईट हे ओळखण्याची नवी दृष्टीच आपल्याला अशा जीवनानूभवातून मिळत असते. आणि अशा जीवनानूभवातूनच संवेदनशील मनात नवे आत्मभान जागृत होत असते.

 लौकिकार्थानं १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी प्रत्यक्ष समाजजीवनातील दलित-आदिवासी समाज आपल्या न्याय हक्कांपासून आजही वंचितच आहे. शिक्षणाचा अभाव, आपल्या हक्कांप्रती हव्या त्या प्रमाणात नसलेली जागरूकता, अशा विविध कारणांमुळे विविध पातळ्यांवर होणारे शोषण, अन्याय, अत्याचाराला इथला बहुसंख्य आदिवासी समाज बळी पडत होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही विकासापासून कोसोदूर असलेला हा आदिवासी समाज युगानु युगे दारिद्र्याचेच जीवन का जगत आहे, याची अस्वस्थता संवेदनशील मनाला सतत बोचत असते. त्यामुळे विषमतेला विरोध करण्यासाठीचे वैचारिक द्वंद्व संवेदनशील मनाच्या आत्मभानाला अनेक पातळ्यांवर साद घालत असते. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वणीसारख्या भागात तत्कालीन आमदार भाई नामदेव काळे, तत्कालीन खासदार सुदामकाका देशमुख आणि युवा नेते नेताजी राजगडकर यांनी केलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चेबांधणीच्या प्रभावामुळे हा परिसर चळवळीचा केंद्रबिंदूच झाला होता. 
अशा भागात मामा आणि आकाशवाणीचे उद्घोषक नेताजी राजगडकर यांच्यासारख्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाच्या तालमीत तयार झालेल्या शिवकुमार आडे यांचा 'गुंफण' हा अलीकडेच प्रकाशित काव्यसंग्रह. शिवकुमार आडे आडे हे लहान असताना त्यांची आई त्यांना रामायण, महाभारतातील कथा सांगत असत. अशा कथा ऐकताना 'त्यावेळेस रामाने शंबूकाला का मारले?' यासारखे प्रश्न ते आपल्या आईला विचारत असत, अशा प्रसंगांचा उल्लेख कवी आडे यांनी 'गुंफण'मधील आपल्या मनोगतात केला आहे. या आणि अशा प्रसंगांतून घडलेल्या आडे यांच्यातील चौकसतेचे संवेदनशील रूप म्हणजे 'गुंफण' हा काव्यसंग्रह होय. 

आदिवासी समाज आणि सिमेंट काँक्रिटच्या जंगलात वावरणाऱ्या पांढरपेशा समाजातील जगण्यातील विरोधाभास कवी शिवकुमार आडे यांनी या काव्यसंग्रहातील 'संस्कृती' या पहिल्याच कवितेतून मांडला आहे. 
आदिवासी समाजाला चोरी, बेईमानी, बलात्कार, जातीपातीची उतरंड अशा वाईट प्रवृत्ती नाहीत; तर, श्रम आणि विश्वासपूर्ण मूल्यांच्या भरवशावर जगणारा आदिवासी हाच खरा संस्कृती रक्षक आहे, अशी चपराक कवी आडे हे कथीत संस्कृती रक्षकांना या कवितेत लगावतात. 'अस्तित्व' या कवितेतून आडे यांनी आदिवासी समाजजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या प्रतिमा-प्रतीकांसह संगणक, माऊस आदी २१ शतकातील प्रतिमा प्रतीकांचा वापर करीत बदल्या जगाचे वास्तव आणि आदिवासींच्या तांड्या-वस्त्यांच्या दिशेने सरकरत असलेल्या बुलडोझरपासून सावध राहण्याचे आवाहन कवी आदिवासी समाजबांधवांना करतो...
वर्तमानातील विविध संदर्भांनी आदिवासी समाजबांधवांचे जगणे अधिकाधिक 'बेदखल' कसे होत आहे याचे अस्वस्थ चित्रण आडे यांनी केले आहे. 'बेदखल' या कवितेतून आदिवासींचा आक्रोश मांडला आहे. कधी नक्षलवाद्यांच्या, कधी पोलिसांच्या तर कधी गुप्तहेरांच्या दहशतीच्या सावटाखाली आदिवासींचे स्वातंत्र्यच कसे हिरावून घेतले आहे, याचे भयाण वास्तव कुठल्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही... 

रोज आमच्या जंगलाच्या वस्तीत
फिरतात गुप्तहेर माणसे

कधी पुलीसच्या संगिनीमधून
तर कधी नक्षलवादाच्या बंदुकीतून
छातीवर अनपेक्षित वार होतो
जंगल आमचे राज्य होते
स्वतंत्र आम्ही इथं होतो
 

'आमच्या स्वतंत्र राज्यात आम्हीच चोर ठरविले गेलो' आदिवासी बांधवांचे असे 'बेदखल' होणे स्वातंत्र्याच्या कुठल्या संकल्पनेत बसते, हा कवी शिवकुमार आडे यांनी विचारलेला सवाल संपूर्ण आदिवासी समाजबांधवांचा सवाल होऊन पुढे येतो. फुले, आंबेडकर, मार्क्स, बिरसा मुंडा यांनी दिलेल्या विचारप्रेरणेच्या सांस्कृतिक मूल्यांचा वारसा कवी आडे यांच्या जीवनसंवेदनातून प्रकर्षाने प्रकट झाल्याचे दिसून येते. 
तू
दिला नसता

हातात हात
तर दफनविधी कधीच झाला असता...

हे महामानवा, जिथे आमची वेदना ऐकणारा कुणीही नव्हता तिथे तू आम्हाला आमचे हक्क मिळवून दिलेस, विचारांची अक्षरं आमच्या मृतप्राय झोपड्यांना बांधलीस, अंधश्रद्धा-पोथीपुराणे घेऊन अमानुषतेच्या जगण्यापासून तू आमची सुटका केलीस, तूच आमचा मुक्तिदाता आणि आमच्यासाठी उपमेपलिकडचा तत्तवेत्ताही तूच आहेस. त्यामुळे आकाशातल्या सूर्यालाही ठासून सांगावेसे वाटते की, 'तुझ्यासारखा सूर्य झालाच नाही!' बाबासाहेबांच्या उपकारांची परतफेड करणे कदापिही शक्य नाही, अशा तमाम शोषितांच्या भावनाच कवीने या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. 

'गुंफण' काव्यसंग्रहातील 'अस्तित्व', 'जागलं', 'घुसखोरी', 'गणराज्य दिन', 'प्रशासन', 'फॅशन', 'निवडणूक', 'कुपोषण', 'स्वातंत्र्याचा सूर्य', अशा अनेक कवितांतून शिवकुमार आडे यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनजाणिवांना शब्दरूप देत त्यांचे जगण्यातले वास्तव समाजासमोर मांडले आहे. पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांनी गायलेली आणि मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रण प्रसंगाच्या सचित्र आठवणीचा समावेशही शिवकुमार आडे यांनी या काव्यसंग्रहात केला आहे. 'ध्वनिमुद्रित गाणी' या विभागात 'तुझ्या आठवणीने', 'रुजले बीज', 'गुंफण', 'आई' या कवितांचा समावेश आहे. तर, 'काही निमित्ताने...' या विभागात 'आई', 'आश्रमशाळा : एक चिंतन', 'तुला पाहिलं', 'उकल', 'नेताजी (नेताजी राजगडकर)', 'कळी फुलताना', या कवितांचा समावेश आहे. 'गुंफण'ला डॉ. यशवंत मनोहर यांची प्रस्तावना लाभली आहे. आपल्या प्रस्तावनेत डॉ. मनोहर यांनी कवी शिवकुमार आडे यांच्या जडणघडणीसह त्यांच्या समृद्ध जाणिवांच्या साक्षेपी वेध घेतला आहे. या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने ग्रंथाली प्रकाशनाने आदिवासींच्या जीवनानुभावांचा काव्यागाज वाचकांसमोर ठेवला आहे.


Comments

Popular posts from this blog

नायिका

पत्र...

शून्य...