आत्मभानाचा काव्यागाज
अवतीभवतीच्या वातावरणासह त्यातील सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ आपल्याला अनेकार्थानं समृद्ध करीत असतात. सभोवतालचा परिसर, अर्थात जंगल, त्यातील वृक्ष, नदी, नाले, पशू-पक्षी या नैसर्गिक घटकांसोबतच समाजातील विविध घटना-अनुभवांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. त्यापासूनच आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. काय चांगलं-काय वाईट हे ओळखण्याची नवी दृष्टीच आपल्याला अशा जीवनानूभवातून मिळत असते. आणि अशा जीवनानूभवातूनच संवेदनशील मनात नवे आत्मभान जागृत होत असते. लौकिकार्थानं १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी प्रत्यक्ष समाजजीवनातील दलित-आदिवासी समाज आपल्या न्याय हक्कांपासून आजही वंचितच आहे. शिक्षणाचा अभाव, आपल्या हक्कांप्रती हव्या त्या प्रमाणात नसलेली जागरूकता, अशा विविध कारणांमुळे विविध पातळ्यांवर होणारे शोषण, अन्याय, अत्याचाराला इथला बहुसंख्य आदिवासी समाज बळी पडत होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही विकासापासून कोसोदूर असलेला हा आदिवासी समाज युगानु युगे दारिद्र्याचेच जीवन का जगत आहे, याची अस्वस्थता संवेदनशील मनाला सतत बोचत असते. त्यामुळे विषमतेला विरोध करण्यासाठीचे वै...